My Blog List

Thursday, October 18, 2012

पुणे प्रथम दर्शन...





साल आत्ता नक्की आठवत नाही..पण १९६८ असावे. मी आई-वडिलांसह माझ्या मामेभावाच्या लग्नाच्या निमित्ताने पुणे प्रथम पाहिले. तेव्हा मी स्टेशनवरून टांग्यानी बुधवार पेठेतल्या देव वाड्यात रहात असलेल्या घाटे या मामेबहिणीकडे आल्याचे स्मरते. तेव्हाचे पुणे पानशेत झाल्यानंतर पुरेपुर सावरले होते..कुठेही ती स्मृती फारशी दिसत नव्हती..नवी पेठेत पुरग्रस्तांसाठी उभ्या राहिल्या अर्धवर्तुळाकार झोपडीवजा (निसेनबट) घरे असलेली वसाहत होत असावी..

त्यावेळी आत्ता जिथे सुदर्शन हॉल आहे..तिथे सुदर्शन मंगल कार्यालय होते. तोही आत्ता जे चालवितात.त्या शुभांगी दामले यांच्या सासूबाई तो सारा व्यवस्थापनाचा कारभार पहायच्या..तिथे विवाह होता... खरचं ते पुणं अधिक स्वच्छ, सुंदर भासले..या शहरात कधी पुन्हा स्थायिक होऊ असे वाटण्याचे वयच नव्हते. जेमतेम मी ७ वीत असेन.आपले जग म्हणजे आई-वडील नेतील आणि दाखवतील ते जग..

पण ते.ती सारसबाग...तो शनिवारवाडा... विश्रामबागवाडा.. एवढीच पाहिलेली म्हणजे त्यावरून गेल्याने दिसली तेवढेच पुणे..आणि इकडे स्वारगेट..जिथून सातारला बस जायच्या...

तेव्हा टांगे होते.. वरातीला गॅस बत्ती होत्या...रंगीबेरंगी पोशाखातले बॅंडवाले होते..मात्र रिक्षा नव्हत्या..आम्हाला त्या टांग्यातून जणू पुणेभर आमचीच सामान घेऊन वरात निघाल्यासारखी वाटायचे..

हेच आमचे ते पुणे प्रथम दर्शन...


-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276 







Sunday, October 7, 2012

प्रतिसाद देणारी राणी वर्मा

काळाच्या ओघात लपून राहिलेले गायिका राणी वर्मा यांचे पत्र हाती लागले...१९८३ सालचे आणि काय इतिहासकाळ डोळ्यासमोर तरळू लागला..म्हणूनन त्या आठवणीत तुम्हाला शेअर कराव्यात याहेतूने ते पत्र इथे देत आहे.

श्री

२१ सप्टें.८३
श्रीयुत सुभाष,यांस
स.न.वि.वि.
मी सादर केलला अण्णांच्या (कै. विद्याधर गोखले) पुण्यातील कार्यक्रम तुम्हाला मनापासून आवडला हे वाचून खूप बरं वाटलं. कारण खरोखरच या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व कलाकारांनी, एक उत्कृष्ठ प्रतिचा व दर्जेदार असा कार्यक्रम सादर करावा म्हणून अतिशय मनापासून मेहनत घेतली होती व त्याचे सार्थक तुमच्यासारख्या रसिकांकडून आमचे कौतूक ऐकून झालं. कारण मनापासून पाठ थोपटणारे फार कमी भेटतात, पण उलट कितीही चांगलं केलं तरी त्यातून चुका काढणारीच जास्त भेटतात.

एका गोष्टीचं मात्र राहून राहून वाईट वाटलं की, पुणेकरांकडून मी जो प्रतिसाद अपेक्षिला होता, तो मात्र मला मिळाला नाही. म्हणजे पैशांपेक्षासुध्दा हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी ऐकावा, थोडक्यात म्हणजे हा कार्यक्रम  House Full जावा ही माझी इच्छा होती, कारण पुण्यात अण्णांचे खूप चाहते आहेत. पण त्यामानाने गर्दि कमी होती. पण आलेले लोकमात्र जाणकार होते हे निश्चित.

तुम्ही `चित्ररंग`( हे साप्ताहिक एके काळी मराठीत इंडियन एक्प्रेस ग्रुपने काढले होते) मध्ये व श्री. अशोक रानडे यांवी `स्वराज्य`मध्ये लिहलेला माझ्या कार्यक्रमाचा review वाचला. अतिशय मनापासून व कळकळीने लिहल्याचे जाणवले. खुपच सुंदर आला आहे.





आपली नम्र,
राणी वर्मा.










अनेक कार्यक्रमाबाबत पुण्यात त्यांची नोंद घेतली जात नाही...मात्र माझ्याकडून मी हा प्रयत्न सातत्याने केला आणि आजही करीत आहे...
मात्र अशी पत्राद्वारे त्याची पावती मात्र मिळाला नाही..ती इथे मिळाली म्हणून हा त्याचे हे उदाहरण..

विद्याधर गोखले 


ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. 
४ जानेवारी १९२४ रोजी अमरावती येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. 
 पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. गोखले यांनी एकूण १८ नाटके लिहिली. त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक विषयांवर आधारित आहेत. त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. 
‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’ , ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं. तर ‘बावनखणी’ हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत नाटक. ‘गझलसम्राट गालिब’, ‘शायरेआजम’, ‘शायरीचा शालिमार’ ही गालिबचे काव य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे ‘कविकथा’ हे त्यांचे पुस्तकही गाजले होते. ‘शंकर सुखकर हो’ हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक वेगळीच ष्टी देऊन जातो. 
गोखले यांची

लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती. लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना होता. ‘रंगशारदा’ ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. 
अशा या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचे २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
 

Tuesday, July 24, 2012

पुण्याची ती हवा निघून गेली..

एके काळी पुण्याची हवा देशभरात सर्वात छान म्हणून वास्तव्याची पहिली पसंद लोक पुण्याची निवड करीत..आज ते पुणं उरले नाही...ती हवा निघून गेली...



आता फक्त दुकाचींचे.. तेही सायकल नव्हे बरका..तर मोटारसायकली... शहर म्हणून सर्वाधिक ट्रॉफिक ... चौकाचौकात विहतूक नियंत्रक असणारे आणि त्याचा रंग हिरवा केव्हा होतो आहे ते पाहून वाट पहाणारे...पुणेकर मंडळी..अर्थात ती पुण्यात राहतात ...कोणत्याही निमित्ताने म्हणून...अन्यथा खरा सदाशिव पेठी, नारायण, शनिवार आणि अप्पा बळवंत चौकातला मूळ पुणेकर केव्हाच सिंहगड रस्ता किंवा सहकार नगर , बिबवेवाडी सारख्या उपनगर नामक वसाहतीत गाशा गुंडाळून गेलाय... सोबत घेऊन गेलाय पैशाचे पुडके...तेही व्यावसायिकाला वाडे बांधयला देऊन..

त्यामुळे झालेय काय ...आजुबाजूबाजूची गजबज अधिक वाढली आहे...प्रत्येकाकडे स्वयंचलित वाहने आलेच...कार पुण्याच्या परिवहन सेवेची वैशिष्ट्ये तुम्ही वेळोवेळी वाचतच असाल...गाड्यांचा दर्जा..त्यांची सेवेची गुणवत्ता आणि वाढत्या लोकसंख्येला अपुरे पडणारी वाहनांची उणीपुरी संख्या....

मग काय तो पुणेकर सायकल थोडाच दामटतो...उलट एकादा सायकलवाला दिसला तर पादचा-यासारखा जीव मुठीत घेऊन चालविताना दिसेल..



अर्थात एक नक्की...पुण्याचे पाणी जे अद्यापी आटलेले नाही...कारण चारी बाजूला उभी असलेली धरणे... पण सिमेंटच्या जंगलाचे प्रमाण वाढले आणि वाहतुकीसाठी, सिंमेटचे रस्ते करण्यासाठी आणि बांधकामासाठी सारी ती वृक्षराजी केव्हाच नष्ट झाली...त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. नव्या वृक्षांची लागवड खुरटली आणि ठिकठिकाणी फुटपाथच्या भोवती...एका बंदिस्त पिंज-यात जगावे यासाठी एखाद्या व्यक्तिच्या नावावर केलेली छोटी रोपटे काही भागात दिसतात...पहा केवढे उत्तम पुढले प्लॅनिंग आहे शहराचे...


तापमानाची उष्णता अजुनही तापते आहे..गल्ली-बोळ हमरस्ते होऊ पहात आहेत...शिक्षणसंस्थाना आंतरराष्ट्रीय मोल आले...त्यामुळे वाढत्या फिया देऊन परगावचे विद्यार्थी शिकायला म्हणून येतात आणि पुणेकरच बनून जातात... कधी कधी मराठी माणसाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मराठी मुलांना प्राधान्य द्या असे सांगत संचालकांच्या दारी एकवटून जावे लागते...

एकूण काय...वाढलेल्या पुण्याचे पुर्वीचे शांतपण राहिले नाही..ती हवा नाही..तो निवांतपणा उरला नाही....
अधुनिकतच्या रेट्यात एकेक पाऊल पुढे टाकत हे शहर नवे चकचकीत चित्र घेऊन...
नव्या रिती काबीज करीत...
गतीमान होते आहे....



सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, May 4, 2012

व्हायोलीन गाते तेव्हा...चारुशीला गोसावी



व्हायोलीन गाते तेव्हा...
कलाकार- सौ. चारुशीला गोसावी, पुणे
१ मे २०१२
स्थळ-गांधर्व महाविद्यालय, पुणे
सौ. चारुशीला गोसावी सादर करीत होत्या व्हायोलीन गाते तेव्हा..
साथसंगत-
रविराज गोसावी (तबला)
तालवाद्ये- उद्धव कुंभार
हार्मानियम- शुभदा आठवले
सिंथेसायझर- गौरव कोरगावकर
निवेदन- विनया देसाई
Camera- Madhura Gosavi
Creadted by Subhash Inamdar,Pune
email.-subhashinamdar@gmil.com
9552596276

Thursday, May 3, 2012

दूरवर गेलेल्या त्या दिवसांची आठवण


मागे वळून पाहताना दुरच्या क्षितीजावर एक लाजरी ,कृश मूर्ती दिसते...जीला कधी कोणीही ओळखत तर नव्हतेच पण तीही कुणाला ओळखत नव्हती...दूरवर गेलेल्या त्या दिवसांची आठवण आजही ताजी आहे...आज त्या आठवणी उजळतात तेव्हा डोळे भरून येते मन गलबलते..सारा प्रवासच मग अंधूक दिसू लागतो.
१८ मार्च १९७४ पासूनचा हा प्रवास एका ध्येय्याने.. एकाच उद्देशाने..ह्या पुण्यात आपल्याला रहायचेय..
जिद्द कायम ठेवत ही वाटचाल सुरू केली...अविरत..
अनेक अनुभव साठवत अनेकांचे पुत्रवत..
मित्रवत प्रेम मिळवत ...

सुभाष इनामदार, सातारा (सध्या मुक्काम पुणे)





आठवणीतले पुणे

साठलेल्या मनाच्या कप्प्वात अनेक गोष्टी असतात. त्या मनमोकळे लिहणे हा उद्देश..

Wednesday, May 2, 2012

आठवणीतले पुणे

मागे वळून पाहताना दुरच्या क्षितीजावर एक लाजरी ,कृश मूर्ती दिसते...जीला कधी कोणीही ओळखत तर नव्हतेच पण तीही कुणाला ओळखत नव्हती...दूरवर गेलेल्या त्या दिवसांची आठवण आजही ताजी आहे...आज त्या आठवणी उजळतात तेव्हा डोळे भरून येते मन गलबलते..सारा प्रवासच मग अंधूक दिसू लागतो.
१८ मार्च १९७४ पासूनचा हा प्रवास एका ध्येय्य्ने..एकच उद्देशाने..ह्या पुण्यात आपल्याला रहायचेय..जिद्द कायम ठेवत ही वाटचाल सुरू केली...अविरत..अनेक अनुभव साठवत अनेकांचे पुत्रवत..मित्रवत प्रेम मिळवत ...


साठलेल्या मनाच्या कप्प्वात अनेक गोष्टी असतात. त्या मनमोकळे लिहणे हा उद्देश..

सुभाष इनामदार, सातारा (सध्या मुक्काम पुणे)

inamdar.subhash1@gmail.com
9552596276


मी राहतो पुण्यात



मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त.
इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.
आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे आ इथला धर्म आहे
आणि ऎकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि स्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्रा जागा नाही.
कवीता फाडण्याच्या मंत्र
दोन टोके पानांची
दोन चिमटी बोटांच्या
एक कागद गाण्याच्या
दुसरे दिवशी वाण्याच्या
मोडा तोडा ओढा
एक दऊत फोडा
एक पाय खुर्चीचा
एक पाय टेबलाचा
दोन घाव घाला
कवी खाली आला
गाणे चोळामोळा
पावसात जाऊन खेळा!



पु.लं.